बांबू हस्तकला प्रशिक्षण

लोक बिरादरी प्रकल्पाने स्थानिक आदिवासींचे बांबू हस्तकलेतील कौशल्य पाहून त्याचा उपयोग त्यांच्या उत्पन्नाचे साधन म्हणून करायचे ठरविले. या प्रयत्नाची पहिली पायरी म्हणून, प्रकल्पाने आदिवासींकडून त्यांनी बनविलेल्या बांबूंच्या सर्व वस्तू (संख्या किंवा गुणवत्ता यांकडे लक्ष न देता) विकत घेण्यास सुरुवात केली. प्रकल्पाला कोयनगुडा, कियर, बेजूर, लाहेरी, बंगाडी, फोदेवाडा, इनबट्टी इ. आसपासच्या गावांतून नियमितपणे या वस्तूंचा पुरवठा होतो.

काही वर्षांपूर्वी प्रकल्पातील श्री. श्रीधर आणि श्री. मुन्शी यांनी या गावांत तरुण पिढीसाठी प्रशिक्षण शिबीर घेतले. प्रत्येक गटात ४० ते ५० स्त्री-पुरुष होते. बांबू हस्तकलेला प्रोत्साहन मिळावे यासाठी गावकऱ्यांना बांबूच्या पेट्या, खेळण्यातील जहाजे, प्रदर्शनार्थ ठेवल्या जाणाऱ्या वस्तू इ. कलाकृती बनविणे शिकविले गेले.

प्रकल्पात एक बांबू हस्तकला प्रशिक्षण केंद्र आहे जे ६ कार्यकर्ते सांभाळतात. लोक बिरादरी आश्रम शाळा, हेमलकसा येथील विद्यार्थी आणि आसपासच्या गावातील लोक या केंद्रात प्रशिक्षण घेण्यासाठी नियमितपणे येतात.

प्रकल्पात एक बांबू हस्तकला विक्री केंद्रदेखील आहे, जेथे आदिवासींनी बनविलेल्या सर्व वस्तू असतात. लोक बिरादरी प्रकल्प पाहण्यासाठी येणारे पाहुणे या केंद्रालादेखील भेट देतात आणि अनेक वस्तू विकत घेतात.

जानेवारी २०१८ला, बांबूंच्या या वस्तूंचे एक प्रदर्शन हिरानंदानी इस्टेट, पवई (मुंबई) येथे भरविले गेले. १५ एप्रिल २०१६ला, लोक बिरादरी मित्र मंडळ, डोंबिवली (मुंबई) यांनी एक प्रदर्शन आयोजित केले. पुणे मित्र मंडळ, पुणे देखील पूर्वी नियमितपणे या वस्तूंची खरेदी करत असत.

दुग्ध व्यवसाय

लोक बिरादरी प्रकल्पातील दुग्धालयात १७ गाई, ५ म्हशी आणि २ वळू आहेत. दररोज दोन वेळा त्यांचे दूध काढले जाते. प्रत्येक दिवशी साधारण ३० लीटर दूध जमा होते. पावसाळ्यात हेच प्रमाण साधारणपणे ४५ लीटरपर्यंत जाते.

हे दूध प्रकल्पाच्या भोजनगृहात आणि प्राणी अनाथालयातील प्राण्यांसाठी वापरले जाते. चारा म्हणून दुग्धालयातल्या जनावरांना पशुखाद्य, ज्वारी, मका आणि गवत दिले जाते.

स्वच्छता राखण्यासाठी जनावरांना रोज धुतले जाते. प्रकल्पातील ७ पूर्णवेळ कार्यकर्ते या दुग्धालयाची काळजी घेतात. लसीकरण वर्षातून एकदा आणि Deworming ३ महिन्यांतून एकदा केले जाते.

उन्हाळ्यात या भागातील तपमान फारच वर जाते. तेव्हा गोठा हिरव्या कपड्याने झाकला जातो. तपमान नियंत्रित राखण्यासाठी पंख्यांचादेखील वापर केला जातो. तसेच, जनावरांवर सतत पाणी शिंपडले जाते.

पोल्ट्री

लोक बिरादरी प्रकल्पातील पोल्ट्रीमध्ये ४० कडकनाथ आणि ५०० ब्रॉयलर कोंबड्या आहेत. कडकनाथ दररोज २० अंडी देतात, जी प्राणी अनाथालयातील प्राण्यांना दिली जातात. ब्रॉयलर कोंबड्यादेखील या प्राण्यांना खाण्यासाठी दिल्या जातात. प्रत्येक दीड महिन्याने ३०० ते ५०० ब्रॉयलर कोंबड्या खरेदी केल्या जातात.

कोंबड्यांना विशेष खाद्य लागते जे बाजारातून विकत घेतले जाते. यांत prestarter, starter आणि finisher असे ३ प्रकार आहेत. हे खाद्य कोंबड्यांच्या वयोगटानुसार चढत्या क्रमाने दिले जाते.

प्रकल्पातील ७ पूर्णवेळ कार्यकर्ते पोल्ट्रीची काळजी घेतात. आठवड्यातून एकदा कोंबड्यांचे लसीकरण केले जाते.

उन्हाळ्यात या भागातील तपमान फारच वर जाते. तेव्हा कोंबड्यांचे खुराडे हिरव्या कपड्याने झाकले जाते. तपमान नियंत्रित राखण्यासाठी कूलर्सचादेखील वापर केला जातो. हिवाळ्यात तपमान वाढवण्यासाठी खुराड्यात पिवळे दिवे लावले जातात.

शेती प्रकल्प

औपचारिक शिक्षणाशिवाय शिक्षकांनी शेतीविषयक प्रशिक्षणावर सुध्दा भर दिला. माडिया गोंड जमातीला भाजी उत्पादन माहित नव्हते. त्यांना फ़क़्त भात उत्पादनाची कल्पना होती. बाकीच्या गरजा ते जंगलातून पूर्ण करत असत. कुत्रा, मांजर, माकड, पक्षी अशा सर्व प्राण्यांचे मांस ते खायचे. ते बरेचदा हे मास वाळायला ठेवत असत ज्यामुळे ते जास्त दिवस टिकायचे.

लोक बिरादरीच्या कार्यकर्त्यानी आदिवासींना संक्रमित बी-बियाणे दिले ज्यामुळे त्यांचे पिकांचे उत्पादन वाढले . भाजी, फळे यांच्या बी-बियाणांचे ही वाटप त्यांनी केले. शाळेच्या विद्यार्थ्यांना सुधारित शेतीविषक तंत्रज्ञान पण देण्यात आले.यामुळे प्रत्येक आदिवासीं भाजी आणि फळे यांची पिकेही घेऊ लागला.सरकारने ही मग संक्रमित बी-बियाणांचे वाटप चालू केले.

दुसरी महत्वाची कामगिरी म्हणजे जल-सिंचन सुविधा प्राप्त करून देणे. कधी कधी जास्त पावसाने पिकांचे नुकसान होत असे अशा वेळी लोक बिरादरी प्रकल्पातर्फे डिझेल वर चालणारे पंप भाड्याने दिले जात. ही प्रक्रिया अजूनही सुरु आहे पण आता बर्‍याच आदिवासींकडे स्वत:चे पंप्स आहेत. त्याच्या दुरुस्तीसाठी प्रकल्पातर्फे यावर प्रशिक्षण दिले जाते. दरवर्षी २० पंप्स दुरुस्त होतात. कीटक नाशक फवारणी करीता स्प्रे पंप्स पण लोक बिरादरी प्रकल्पाकडून भाड्याने दिले जातात.

महुआ

महुआची लागवड उष्ण आणि दमट भागात त्याच्या तेल असलेल्या बिया (पूर्ण वाढ झाल्यावर दरवर्षी प्रत्येक झाड २० ते २०० कि.ग्रॅ. बिया देते), फुले आणि लाकडासाठी होते. स्थानिक आदिवासी जे जंगलात राहतात, महुआ झाडाला वरदान समजतात आणि त्याची खूप काळजी घेतात. भारतातील उष्णकटिबंधीय भागातील रहिवासी महुआच्या फुलांपासून दारू बनवितात. या दारूचा जनावरांवरही परिणाम होतो. आदिवासी महुआ झाड आणि त्याच्या फुलांपासून बनविलेले पेय हे आपला सांस्कृतिक वारसा मानतात. हे पेय त्यांच्या दैनिक जीवनातील आणि उत्सवांतील अविभाज्य भाग आहे.

दुर्दैवाने हे पेय एक व्यसन बनले आहे, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब प्रभावित होते. बऱ्याच वेळा कुटुंबातील, आई आणि वडील, दोघेही व्यसनाधीन झालेले दिसतात.

लोक बिरादरी प्रकल्पाच्या “ग्रामविकास योजने”अंतर्गत जिंजगावात तलाव खोदण्याचे काम सुरु होते. असे काम सुरु करण्यापूर्वी प्रकल्प स्थानिक ग्रामसभेकडून नेहमीच एक करार करून घेते. करारातील एक महत्वाचे कलम आहे “दारूबंदी”. ग्रामसभेने हे कलम मान्य केले पण गावातील एक ज्येष्ठ नागरिक, श्री. सीताराम मडावी, यांनी एक प्रश्न विचारला.

"जर आम्ही महुआच्या फुलांपासून मद्य बनविणे बंद केले, तर होणारे आर्थिक नुकसान कसे भरून काढायचे?"

या प्रश्नामुळे प्रकल्पाने इतर आर्थिक पर्याय शोधण्यास सुरुवात केली. अपर्णा पल्लवी, ज्या महुआ फुलांपासून बनविल्या जाणाऱ्या उत्पादनांच्या विविध शक्यतांवर काम करत होत्या, यांनी एक पर्याय सुचविला. त्यांनी महुआ फुलांपासून काही खाद्यपदार्थ बनविले होते आणि साधना विद्यालय, नेलगुंडा (जे प्रकल्पामार्फत चालविले जाते) येथील मुलांना लाडू खूप आवडले. प्रकल्पाने एक Food Processing Unit (FPU) सुरु करण्याचा निर्णय घेतला, जेथे महुआ लाडू बनविले जातील. हे केंद्र सुरु करण्याचा उद्देश, आदिवासींमध्ये महुआ फुले हे एक पौष्टिक अन्न असल्याबद्दल जागरुकता निर्माण करणे, महुआ फुलांपासून बनविलेली दारू पिण्यापासून त्यांना परावृत्त करणे आणि महिलांना आर्थिकदृष्टीने सक्षम बनविण्याचे होते. प्रकल्पातील सौ. समिक्षा आमटे आणि सौ. शांती गायकवाड या उपक्रमाची देखरेख करीत आहेत.

हे केंद्र सुरु करण्यातील पुढील पायरी म्हणजे केंद्रासाठी आर्थिक मदत शोधणे. प्रकल्पाने व्यवसाय प्रस्ताव MAVIM (Mahila Arthik Vikas Mahamandal)चे श्री. रमेश मडावी यांना पाठवला आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. MAVIMचे एक प्रतिनिधी मंडळ प्रकल्पात या केंद्राबद्दल पुढील चर्चा करण्यासाठी आले.

असे ठरविण्यात आले की MAVIM केंद्राला निधी उपलब्ध करून देईल आणि GST, PAN, खाद्य परवाना, गॅस जोडणी, यंत्रसामुग्री इ. कामांची काळजी घेईल. SHG फेडरेशन (त्रिवेणी संगम लोक संचालित सदन केंद्र) MAVIM आणि प्रकल्प यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल. SHG फेडरेशन केंद्रासाठी जागा, स्त्री कामगारांची भरती, कच्चा माल खरेदी इ. कामांची काळजी घेईल. प्रकल्प सर्व कामांच्या प्रगतीवर देखरेख करेल आणि गरज भासल्यास केंद्राला विशिष्ट सामग्री पुरविणे, मालाची साठवणूक इ. कामात मदत करेल. असेही ठरविण्यात आले की, MAVIM आणि प्रकल्प महुआ लाडूंचे प्रथम ग्राहक असतील.

MAVIMने १.७५ लाखांची प्रारंभिक गुंतवणूक केली ज्यांत हेमलकसा येथील जागेचे भाडेदेखील (वार्षिक रु. १०,०००/-) समाविष्ट होते. सुरुवातीला केंद्रात ७ महिला कामगार होत्या. आता १२ आहेत. १ पुरुष कामगारदेखील आहे, जो वाहतूक, जमाखर्चाचा हिशोब ठेवणे इ. कामे पाहतो. दैनंदिन कामाची वेळ (रविवार सोडून) ९ ते ६ आहे.

महुआची फुले प्रथम धुतली जातात. ती कडक उन्हात सुकवून कांडप यंत्राने कुटली जातात. या फुलांची पूड, गूळ, अंबाडीच्या बिया किंवा शेंगदाणे आणि तेल वापरून लाडू बनविले जातात. एका दिवसात साधारण ५०० लाडू बनविण्याची केंद्राची क्षमता आहे. ५०० लाडूंसाठी २५ कि.ग्रॅ. महुआची फुले, १० कि.ग्रॅ. गूळ आणि ६-७ कि.ग्रॅ. अंबाडीच्या बिया किंवा शेंगदाणे लागतात.

लाडू एका पिशवीत भरले जातात. एका पिशवीत १० लाडू असतात. लोक बिरादरी प्रकल्पात असलेल्या विक्रीकेंद्रात प्रत्येक महिन्याला साधारण २००-३०० संच विकले जातात. म्हणजेच महिन्याला साधारण २ ते ३ हजार लाडू !!

प्रकल्प प्रत्येक लाडूसाठी केंद्राला १० रुपये देत असे. मार्च २०१८पासून, ही रक्कम वाढवून १२ रुपये करण्यात आली आहे. भविष्यात महुआच्या फुलांपासून चॉकलेटस् बनविण्याचा प्रकल्पाचा मानस आहे.

सप्टेंबर २०१७ला, केंद्रातील एक गट छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा येथे एका परिसंवादाला गेला. तेथील जिल्हाधिकारी, श्री. सौरभ कुमार, यांनी दंतेवाडाच्या स्थानिक आदिवासींना महुआ लाडू बनविण्याचे प्रशिक्षण देण्याची विनंती केली. हे प्रशिक्षण लोक बिरादरी प्रकल्पात ५ ते ७ डिसेम्बर २०१७ ला देण्यात आले.

स्वप्ने सत्यात उतरली

हेमलकसा आणि त्याच्या आसपासची गावे घनदाट जंगले आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जातात. पण येथे काही समस्याही आहेत. पाण्याचे संवर्धन ही एक मोठी समस्या आहे. येथील जमीन पाणी शोषून घेते. तरीदेखील प्रत्येक वर्षी होणाऱ्या मुसळधार पावसानंतरही गावकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी आणि शेतीसाठी पाणी यांसाठी झगडावे लागते. नदी आणि कालवे यांसारख्या नैसर्गिक स्त्रोतांवरच सर्व गावे अवलंबून असतात. यामुळे पावसाळा संपला की सगळेच (माणसे आणि जनावरे) पाण्यासाठी झगडतात.

श्री. अनिकेत आमटे, लोक बिरादरी प्रकल्पाचे एक संचालक, यांना एक अद्वितीय कल्पना सुचली. त्यांनी गावकऱ्यांना विचारले, "आपण पाण्यासाठी इतर संसाधने, जसे की मोठे तलाव, यांचा विचार करू शकतो का? जर आपण गावाच्या लोकसंख्येनुसार तलाव खोदला, तर प्रत्येकालाच पिण्यासाठी आणि शेतीसाठी पुरेसे पाणी मिळेल. यामुळे भूमिगत पाण्याची पातळी वाढण्यासाठीदेखील मदत होईल. प्रत्येकालाच दरवर्षी एकापेक्षा जास्त पिके घेता येतील."

पण त्यांनी काही अटीही घातल्या. त्या खालीलप्रमाणे,

१. गावकऱ्यांना तलाव खोदकामाच्या एकूण खर्चापैकी १०% रकमेचे योगदान द्यावे लागेल. यामुळे प्रत्येकातच मालकीची भावना निर्माण होईल आणि प्रत्येकजण तलावाची काळजी घेईल.
२. दारूबंदी
३. तंबाखू, गुटखा, खर्रा बंदी
४. वृक्षतोडबंदी आणि वृक्षारोपण

ग्रामसभेच्या अध्यक्षांना एक सभा घ्यावी लागेल आणि ७०% गावकऱ्यांकडून ह्या अटी पाळण्यासाठी मंजुरी घ्यावी लागेल. हे झाल्यावर तलावाचे खोदकाम सुरु होईल.
तो दिवस होता ६ जानेवारी २०१७, जेव्हा आम्ही "बेजूर" या गावी खोदकाम सुरु केले, जे लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसापासून अल्लापल्लीच्या बाजूला साधारण ३ कि.मी. वर आहे. तलावाचे आकारमान १०० x ५० मीटर आहे आणि तो ३ मीटर खोल आहे. खोदकाम साधारण १५ ते २० दिवसांत पूर्ण झाले. या कामावर साधारण १० लाख रुपये खर्च झाले. याप्रमाणे आम्ही अनेक गावांत तलाव खोदले आहेत.

१. बेजूर
२. कुमरगुडा
३. हेमलकसा
४. नेलगुंडा
५. दर्भा
६. हलवेर
७. पिडमिली

अधिक मिळकत स्त्रोताचे निर्माण
हेमलकसा आणि आसपासच्या घनदाट जंगलात राहणारे समुदाय हे मुख्यत्वे जंगली फळे, फुले गोळा करणारे आणि शिकारी आहेत. बऱ्याच शतकांनंतर ते स्थायिक होत आहेत आणि शेतीकडे वळत आहेत. त्यांच्या उत्पन्नाचे एकमेव साधन शेती आहे. उत्पन्नाचा दुसरा पर्याय निर्माण व्हावा, यासाठी लोक बिरादरी प्रकल्पाने त्यांना मासेमारीचे औपचारिक प्रशिक्षण देण्याचे ठरविले.
५ गावातील ५ व्यक्तींना मासेमारी, मत्स्यउत्पादन आणि मत्स्यपालन यांचे औपचारिक प्रशिक्षण डिंबे, पुणे येथे देण्यात आले. ते उत्तमरीत्या प्रशिक्षित आहेत आणि आता ते इतर गावकऱ्यांना हे ज्ञान देतील. त्यामुळे, त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते मासेमारीकडे उत्पन्नाचे अजून एक साधन म्हणून पाहतील.
खाली दिलेली छायाचित्रेच जास्त बोलकी आहेत.

 

बेजूर - आधी
बेजूर - नंतर

 

कुमरगुडा - आधी
कुमरगुडा - नंतर

 

हेमलकसा - आधी
हेमलकसा - नंतर

 

दर्भा - आधी
दर्भा - नंतर

 

हलवेर - आधी
हलवेर - नंतर

 

पिडमिली - आधी
पिडमिली - नंतर

 

नेलगुंडा - आधी
नेलगुंडा - नंतर